नमस्कार मित्राणो,

     वेबसाईट मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत !!!!
 डायरेक्ट मराठीमधून पहिलीच वेबसाईट आहे. तेव्हा चुकभुल द्यावी घ्यावी. मुळात मी काही लेखक नाही, आणि रोजच्या वाचनात इतक्या घडामोडी येत असतात, इतकी वैविध्यपूर्ण माहिती असते तीच जर जपून ठेवता आली तर उत्तम या हेतूने मी आता मला आवडलेली किंव्हा उपयुक्त वाटलेली माहिती मी इथे संकलीत करत आहे. लेखकाचे नावही लिहिलेले असेल. ह्या जालनिशीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपता यावी असा माझा उद्देश आहे. अधूनमधून माझेही लिखाण वाचायला मिळेलच.

 

 

अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक महावीर

वर्धमान महावीर (इ.स.पू ५२७ - इ.स.पू ५९९) हे जैन धर्माचे २४ वे व शेवटचे तीर्थंकर होते. महावीराचे मूळ नांव वर्धमान होते. त्यांचा जन्म कुंदग्राम या वैशालीच्या उपनगरात झाला. त्याच्या वडिलांचे नांव सिद्धार्थ तर आईचे नांव त्रिशला होते. महावीराच्या जन्मासंबंधीच्या अनेक आख्यायिका जैन धर्मग्रंथात सांगितल्या आहेत. कल्पनासूत्र नावाच्या ग्रंथात वर्धमानाच्या जन्मोत्सवाची व त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती आहे.वर्धमानाचे बालपण ऐषाआरामात गेले. त्याचा विवाह यशोदा नावाच्या एका सुंदर स्त्रीशी झाला होता त्यास प्रियदर्शिनी नावाची मुलगीही होती. महावीराची विचारधारा ही चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यास अधिक काळ आकर्षित करू शकले नाही. संसाराचे आकर्षण त्याच्या मनात निर्माण होऊ शकले नाही.त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तर तो अधिक विरक्त झाला. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दु:ख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्याला झाली. दु:ख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्याला वाटायचे. आपले वडीलबंधू नंदीवर्धन यांची परवानगी घेऊन त्याने गृहत्याग केला.
सुमारे अडीच हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इ. स. पूर्व 599 मध्ये वैशालीच्या क्षत्रिय कुंडलपूरात पिता सिद्धार्थ आणि माता त्रिशाला यांनी चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर महावीर वर्धमानाला जन्म दिला. लोक महावीरांना 'वीर', 'अतिवीर', आणि 'सन्मति' या नावानेही ओळखतात.

जैन धर्मीयांचे चोवीसावे तीर्थंकर महावीर स्वामी अहिंसेचे मूर्तीमंत प्रतीक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन त्याग आणि तपस्येत व्यतीत केले. ज्या युगात हिंसा, पशू ह‍त्या, जाती‍भेदाचे प्रमाण वाढले होते. त्याच युगात महावीरांचा जन्म झाला होता. महावीराने आपल्या प्रवचनातून जगाला सत्य आणि अहिंसेचे धडे दिले. संपूर्ण जगाला पंचशील तत्वाचा उपदेश दिला.

या पंचशील तत्वात सत्य, अहिंसा, अपरिग्रह, अस्तेह आणि दया यांचा समावेश होतो. त्यांनी आपल्या काही खास उपदेशातून जगाला योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या प्रत्येक प्रवचनात ते सत्य आणि अहिंसेचा प्रचार करत असत.

सत्य
सत्याविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'हे मानवा! सत्य हेच खरे तत्व असून प्रत्येकाने सत्याच्या आज्ञेत राहीले पाहिजे.'

अहिंसा
भूतलावर अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही सजीव प्राण्यांची हिंसा करू नये. त्यांच्याप्रती मनात प्रेम भावना ठेवून त्यांचे संरक्षण मानवाने करावे. अशा प्रकारचा अहिंसा संदेश भगवान महावीर आपल्या उपदेशात देत असत.

अपरिग्रह
परिग्रहाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'जो मनुष्य सजीव आणि निर्जीव वस्तूंचा संग्रह करतो. तसेच दुसर्‍यांकडून संग्रह करून घेतो किंवा दुसर्‍याला अशा प्रकारचा संग्रह करण्यास परवानगी देतो. त्या व्यक्तीची दु:खापासून कधीच सुटका होत नाही. हाच संदेश महावीरांनी अपरिग्रहाच्या माध्यमातून जगाला देण्याचा प्रयत्न केला.'

ब्रह्मचर्य
ब्रह्मचार्य उत्तम तपस्या, नियम, ज्ञान, दर्शन, चरित्र, संयम आणि नम्रतेचे प्रतीक आहे. तपस्यात ब्रम्हचर्य सर्वश्रेष्ठ असल्याचा अमूल्य संदेश महावीरांनी दिला. जो पुरूष स्त्रीशी संबंध ठेवत नाही त्याला मोक्षप्राप्ती मिळते असे ते आपल्या संदेशात म्हणत असत.

क्षमा
क्षमा या पंचशील तत्वाविषयी बोलताना महावीर सांगतात की, 'मी सर्व प्राणीमात्रांना क्षमा करू इच्छितो. जगातील सर्व प्राणीमात्रांबरोबर मैत्री केली पाहिजे. कुणाशीही वैर नसावे. मी अंतकरणाने धर्मात स्थिर झालो आहे. सर्व प्राणीमात्रांना मी सर्व अपराधांची क्षमा मागतो. माझ्याविरूद्ध ज्याने अपराध केला असेल त्यालाही मी माफ करू इच्छितो. माझ्या मनात आलेल्या वाईट विचारांबद्दल किंवा माझ्याकडून झालेले सर्व पापांचा नाश होऊ दे.

धर्म
धर्म सर्वात चांगला मंगळ आहे. अहिंसा, संयम आणि तप हाच खरा धर्म आहे. जे धर्मात्मा आहेत आणि त्यांच्या मनात नेहमी धर्म असतो. त्यांना ईश्वरही नमस्कार करत असल्याचे महावीर म्हणतात. भगवान महावीरांनी आपल्या प्रवचनात धर्म, सत्य, अहिंसा, ब्रम्हाचार्य आणि अ‍परिग्रह दयेवर अधिक भर दिला आहे.

त्याग, संयम, प्रेम, करूणा, शील आणि सदाचार हे त्यांच्या प्रवचाचे सार होते. त्यांनी चतुर्वेद संघाची स्थापना केली. देशातील विविध भागात फिरून त्यांनी आपल्या पवित्र संदेशाचा प्रचार आणि प्रसार केला. भगवान महावीरांनी वयाच्या 72 व्या वर्षी इ.स. पूर्व. 527 मध्ये कार्तिक कृष्ण अमावस्येला पावापुरी येथे समाधी घेतली.


भगवान महावीरांचा अहिंसेविषयी उपदेश

भगवान महावीर म्हणतात, की जाणते किवा अजाणतेपणातून कुणाची हिंसा करणे योग्य नाही. याशिवाय दूसर्‍यांच्या मार्फतही कुणाची हिंसा घडवून आणू नये. कुठल्याही जीवांना मन, शरीर किवा बोलण्याने दंडीत करू नका. सर्वांच्या आत एकच आत्मा आहे.

आपल्याप्रमाणेच प्रत्येकाला आपापले प्राण प्रिय आहेत. तशा प्रकारची विचासरणी आचरणात आणल्यावर भय व द्वेषापासून मुक्ती मिळवून कोणत्याही प्राण्याप्रती हिंसा करू नये.

स्वतः हिंसा करणारा, दूसर्‍याकडून हिंसा घडवून आणणारा व दुसर्‍याने केलेल्या हिंसेचे समर्थन करणारा स्वतः प्रति द्वेष वाढवित असतो. कोणत्याही प्राण्यांची हिंसा न करणे हीच ज्ञानाची खरी परिभाषा आहे.

अहिंसेविषयी एवढे ज्ञान असले तरी भरपूर आहे. हेच अहिंसेचे विज्ञान आहे. प्रत्येक जीव किवा प्राण्यास आपला जीव प्रिय असतो. दुःखापेक्षा सुख हवेहवेसे वाटते. जगण्यातील आनंद सगळ्यांनाच हवाहवासा वाटतो.

म्हणूनच कोणत्याही प्राण्याची हिंसा करू नका. आपल्या आत्म्याप्रती असणारा भाव इतर प्राण्यांविषयीही असू द्या. सर्व प्राणीमात्रांविषयी अहिंसेचा भाव राखावा. मन, वाणी व शरीराने कुणाचीही हिंसा न करणारा खरा संयमी व्यक्ती म्हणून गणला जातो.

चालताना, बोलताना, बसताना किंवा जेवण करताना असावध असणारा, स्वतःची पूर्ण खात्री झाल्याशिवाय, पाहिल्या व विचार केल्याशिवाय क्रिया व कृती करणारा हिंसा करत असतो.

असा व्यक्ती कर्मबंधनात अडकत असतो. दुःखास सर्वच जीव घाबरतात, हे लक्षात ठेऊन कोणत्याही जीवास कष्ट पोहचविणे टाळावे.
 

 

महावीर- गौतम बुद्ध आधी कोण होते?
                                                                                                                    -महावीर सांगलीकर

अनेक हिंदुत्ववाद्यांना असे वाटत असते की त्यांचा धर्म जगातील सगळ्यात जुना धर्म आहे. त्यांना असेही वाटते की भारतातील जैन, बौद्ध, शीख आणि इतर धर्म हिंदू धर्माच्याच शाखा/ पंथ आहेत, व हे धर्म हिंदू धर्मातून फुटून निघालेले धर्म आहेत. त्यांचे असे वाटणे हे हिंदू हा एक धर्म आहे आणि तो जगातील सगळ्यात जुना धर्म आहे या दोन गृहितकावर आधारीत आहे.

हिंदुत्ववाद्यांना त्यांच्याच धर्माची नीट माहिती नसल्याने त्यांना जैन धर्म व बौद्ध धर्म ही नेमकी काय चीज आहे आणि त्यांचा इतिहास नेमका काय आहे हे माहीत असणे शक्यच नाही. त्यामुळे त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज हा असतो की महावीर व गौतम बुद्ध हे 'आधी' हिंदूच होते.  इथे त्यांना हिंदू या शब्दाआडून हे सांगायचे असते की हे दोघे आधी वैदिक होते. हे लोक जैन, बौद्ध यांना हिंदू धर्माचा पंथ ठरवतात, पण वैदिक धर्म हा हिंदू धर्माचा पंथ आहे असे कधीच म्हणत नाहीत, कारण हिंदू म्हणजेच वैदिक असे त्यांचे साधे गणित असते.

जैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी)  पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे. त्या परंपरेतील  लोकांना हिंदू म्हणणारे लोक आपले अज्ञान दाखवत असतात असेच म्हणावे लागेल.

अशा लोकांना सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी तोही हिंदू (म्हणजे वैदिक) होता असे वाटत असते. पण सम्राट अशोक आधी जैन होता, नंतर बौद्ध झाला. (पहा: ते अर्ली फेत ऑफ  असोका: एड्वर्ड थॉमस).

महावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे.  पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.

वैदिक धर्म हा ब्राम्हण धर्म म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे ब्राम्हण नसलेल्यांचा या धर्माशी संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच आजचा हिंदू धर्म हा जैन, बौद्ध, शैव  आणि वैदिक धर्म यांची भेसळ आहे.

 

आर्थिक विकासदर ६.१ टक्क्यांवर घसरला

वाढलेले व्याजदर आणि महागाईने जनेतच्या खिशाला कात्री लावण्याबरोबरच देशाच्या आर्थिक विकासालाही 'बेक' लावला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत आर्थिक विकासदर ६.१ वर राहिला असून ही गेल्या ११ तिमाहीतील निचांकी वाढ आहे. मोठ्या प्रमाणात वाढलेले व्याजदर आणि कच्च्या मालाचे चढे भाव यांच्यामुळे बचत आणि उत्पादनावर परिणाम झाल्याने विकासाला खीळ बसल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये विकासदर ६.१ टक्के इतका राहिला असून, त्या आधीच्या वर्षात तेवढ्याच काळात तो ८.३ टक्के होता. यावरून भारतीय अर्थव्यवस्था कठीण कालखंडातून जात असल्याचे स्पष्ट होते, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

उत्पादननिती, खाण उद्योग आणि कृषी या तीन क्षेत्रांच्या खराब कामगिरीमुळे विकासाचा वेग मंदावला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर २०१०च्या तुलनेत गेल्या वषीर्च्या या कालखंडात उत्पादननिर्मितीची वाढ ७.८ टक्क्यांवरून ०.४ टक्क्यांवर कोसळली तर कृषी क्षेत्राचा विकासदर ११ टक्क्यांवरून २.७ टक्क्यांवर आपटला आहे. बांधकाम क्षेत्राचा विकासही मंदावल्याचे दिसून आले आहे. विकासदर कमी होण्याचे प्रमुख कारण वाढलेले व्याजदर आणि कच्च्या मालाची भाववाढ आहे. त्यामुळे आता सरकार आणि रिझर्व्ह बँकेने वेगाने निर्णय घेऊन औद्योगिक क्षेत्राला चालना द्यावी, अशी मागणी तज्ज्ञांनी केली आहे.

व्याजदर, महागाई एक त्रांगडे

अठरा महिन्यांत लागोपाठ तेराव्यांदा रिझर्व्ह बँकेने व्याजदर वाढवल्याने खरेच महागाई आटोक्यात येणार आहे का, हा एकच प्रश्न सर्वसामान्य माणसाला भेडसावतो आहे. तसे झाले नाही तर मात्र सारेच संतुलन बिघडून वाढलेली महागाई आणि खुंटलेला विकास अशा दुहेरी समस्यांची ओझी सरकारला वाहायला लागणार आहेत...

..................

ऐन दिवाळीच्या खरेदीच्या धामधुमीत, रिर्झव्ह बँकेने आपले त्रैमासिक पतधोरण जाहीर करत सामान्यजनांना वाईट व चांगली अशा दोन्ही बातम्या दिल्या आहेत. मार्च २०१०पासून सलग तेराव्यांदा व्याजदराची वाढ करत तो आता ८.५ टक्क्यांवर आणून ठेवला आहे. सतत वाढत जाणाऱ्या महागाईवर हा रामबाण उपाय असल्याचे सांगत, ही महागाई डिसेंबरपर्यंत दक्षिणायन करेल व तसे तिने केले तर डिसेंबरमध्ये व्याजदरात कोणतीही लक्षणीय वाढ करणार नाही, असा दिलासा रिझर्व्ह बँकेने दिला आहे. व्याजदराच्या वाढीबरोबरच बचत खात्यावरील व्याजदर मोकळे केल्याची चांगली बातमी रिझर्व्ह बँकेने सामान्य भारतीयाला दिवाळी भेट म्हणून दिली आहे. गेली अनेक वर्षे ४ टक्के इतकेच व्याज मिळणाऱ्या बचत खात्यावर मोकळेपणाने व्याज द्यायला बँका मुक्त असतील. ह्या घोषणेमुळे बऱ्याच नोकरदार व निवृत्त लोकांना महागाईशी लढताना दिलासा मिळेल. आज भारतात बचत खात्यांमध्ये एकूण १४,६९,९०० कोटी इतकी प्रचंड रक्कम आहे. बँका त्यावर फक्त ४ टक्के व्याज देऊन तोच पैसा १३ ते १६ टक्के व्याजदरावर (क्रेडिट कार्डवर ३६ टक्के) लोकांना कर्ज देऊन अमाप पैसा मिळवत होत्या. आता जास्तीत जास्त बचत खात्यातील रक्कम आपल्याकडे वळवण्यासाठी बँकांना बचत खात्याचे व्याजदर वाढवायला लागतील. येस बँकेने लगेच हे दर ६ टक्क्यांवर आणून ह्या स्पर्धेची सुरुवात केली आहे. ह्यामुळे बचत खातेदाराच्या हातात थोडाफार जास्त पैसा येईल. अर्थात त्यामुळे बँकांच्या नफ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच शेअर बाजारात बँकांच्या शेअरची किंमत ३ ते ४ टक्क्यांनी कमी झाली.

अर्थात सामान्य माणसाला ह्या छोट्या भेटीने मिळालेला दिलासा अल्पच असणार! महागाईचा हा भस्मासूर-नरकासूर एखादी देवी रिझर्व्ह बँकेच्या रूपात येऊन नष्ट करील का, हाच प्रश्न आता त्याला भेडसावतो आहे. 'व्याजदर वाढवून मी महागाई रोखण्याचा प्रयत्न करतो आहे', हे वाक्य त्याने गेल्या ६ महिन्यांत १३ वेळा ऐकले असल्यामुळे त्याचा अशा घोषणांवरचा विश्वास कमी होत चालला आहे. ही भीती अनाठायी नाही, कारण ही घोषणा होऊन ४८ तास उलटत नाहीत तोच महागाई निर्देशांकाने ११ टक्क्यांहून अधिक उंची गाठल्याचे जाहीर झाले आहे.

व्याजदर : रिझर्व्ह बँकेचे शस्त्र

कोणत्याही देशात महागाई, पतपुरवठा, व्याजदर, चलनदर, विकास दर हे शब्द सरकार, रिझर्व्ह बँक व कॉर्पोरेट क्षेत्रात वापरायचे शब्द आहेत. त्यातला एक 'महागाई' हा असा शब्द आहे की, ज्याची झळ सतत सामान्य माणसाला बसत असते. त्यामुळे व्याजदर वाढवून ही महागाई कशी रोखणार असा प्रश्न त्याला पडणे सहाजिक आहे. ह्याचा थोडक्यात खुलासा करायचा तर, हे गणित अर्थशास्त्रीय ठोकताळयांवर आधारित असते. व्याजदर वाढवले की कर्ज महाग होईल, कर्ज महाग झाले की बाजारात येणारा पैसा कमी होईल व त्यामुळे मागणी कमी होईल व मागणी कमी झाली की त्या वस्तूची किंमत कमी करून विक्रेते ती बाजारात आणतील व किंमत कमी झाली की महागाई आटोक्यात येईल, हे ते गणित. म्हणजेच महागाई जर जास्त मागणीमुळे झाली असेल तर पैशाचा पुरवठा कमी करून ती आटोक्यात येऊ शकते. आज व्याजदर वाढवल्यामुळे राहत्या जागा किंवा मोटारी, वातानुकूलित यंत्र, मिक्सर, दूरदर्शन संच इत्यादी गोष्टी हप्त्याने घेणाऱ्या लोकांना त्या आणखी महाग होतील. त्या महाग झाल्यामुळे लोकांची मागणी कमी होईल व मागणी कमी झाली की आपोआपच ह्या वस्तूंचे भाव पडू लागतील.

रिर्झव्ह बँकेचे सुब्बाराव ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ह्या वाढीव व्याजदरामुळे आज १० टक्क्यांच्या वर असणारा महागाईच्या वाढीचा दर डिसेंबरपर्यंत ८ टक्क्यांवर येईल. ९ मार्च २०१२पर्यंत ६ टक्क्यांवर येईल. अर्थशास्त्राच्या ठोकताळयांप्रमाणे त्यांचे हे विचार योग्य असतीलही. पण असेच विधान १२ महिन्यांपूर्वी दर वाढवताना करण्यात आले होते, पण महागाईचा वाढीचा दर मात्र सतत उत्तरायण करत राहिला. बऱ्याच तज्ज्ञांनी ह्यावर उलटसुलट प्रतिक्रिया दिल्या आहेत. १३ वेळा व्याजदर वाढवूनही जर महागाई आटोक्यात येत नसेल तर रिझर्व्ह बँकेचे हे शस्त्र खरोखरच परिणामकारक आहे का? की, महागाईची कारणे अनेक असताना त्यातील फक्त जास्त मागणीवर आधारित महागाईवरच रिझर्व्ह बँक आपली तलवार चालवत बसली आहे व इतर कारणांवर उपाय न झाल्याने महागाईचा दर मात्र वाढतच आहे?

महागाईचे प्रकार

अती मागणीमुळे होणारी महागाई व पुरवठ्यातील तुटवड्यामुळे होणारी महागाई ह्या दोन वेगळ्या आहेत. त्यावर वापरायची शस्त्रे व उपायही वेगळे आहेत. पण आज जगात महागाईचे, अन्नधान्यातील महागाई व इतर वस्तूंतील महागाई, असे दोन वेगळे भाग असल्याचे सांगण्यात येते. व्याजदर वाढवून अन्नधान्याची महागाई आणखीनच वाढण्याचा धोका उत्पन्न होतो आणि कदाचित भारतीय अर्थव्यवस्थेतील गेल्या २४ महिन्यांतील दृश्य हेच अधोरेखित करते. व्याजदर वाढवले की, शेतकऱ्यांची व शेतीआधारित उद्योगांची जास्त पंचाईत होते. व्याज वाढल्याने त्यांच्या शेतीखर्चात वाढ होते. आज भारतातील शेतकरी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत आहेत. वाढीव व्याजाबरोबरच, महागत जाणारा खत-बियाणांचा खर्च, अडते व वायदेबाजारांमुळे फुगत जाणारे बाजारभाव व त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसा न येता महागाईचे त्याच्यावर फोडले जाणारे खापर ह्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. त्यामुळेच वाढीव व्याजदरामुळे अन्नधान्य अधिकच महाग होताना दिसत आहे. बाजारातील इतर वस्तूंचे भाव कदाचित कमी होतील पण कपडे, फ्रीज, मोटारगाडी, टी.व्ही. ह्यांच्या किंमती कमी झाल्याने सर्वसामान्य माणसाला रोजच्या आयुष्यात महागाईपासून दिलासा कसा मिळणार? दुधाला लिटरमागे ४४ रुपये देताना ग्राहकाला त्रास होणारच. म्हणूनच अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या टोपल्यांमधल्या वस्तूंच्या महागाईकडे वेगवेगळ्या नजरेने पहाणे व त्यावर त्या त्या पद्धतीने परिणामकारक उपाय योजणे गरजेचे आहे. सरकार व रिझर्व्ह बँक मात्र एकाच शस्त्राने ह्या सर्व असुरांचा नाश करण्याचा सतत अयशस्वी प्रयत्न करत आहे.

विकास दर व महागाई

कोणताही देश अर्थ-उद्योगात प्रगती करत असताना त्या अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा वाढून थोडीफार महागाई होत असतेच हा अर्थशास्त्रीय ठोकताळा आहे. त्यामुळेच महागाईवाढीचा दर जेव्हा ४-५ टक्के होता तेव्हा अर्थ-उद्योग विकासाचे ते चांगले लक्षण मानले गेले. पण आज परिस्थिती वेगळी दिसत आहे. रिर्झव्ह बँकेचे गव्हर्नर सुब्बाराव ह्यांनी त्यांच्या भाषणात व्याजदर वाढवतानाच विकास दर मात्र ८ टक्क्यांवरून ७.६ टक्क्यांवर येईल असा अंदाज व्यक्त केला. मर्यादित महागाई ही जशी विकासाला पोषक असते तसेच महागाईवर व्याजदरामार्गे ठेवलेले नियंत्रण हे विकासाच्या विरोधात जाते. दोन वर्षांपूर्वी भारत १० टक्क्यांच्या वरचा विकास दर गाठेल असे सर्वांनाच वाटत असताना आज मात्र तो ७.६ टक्क्यांवरच मर्यादित राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. विकास व महागाई ह्यांच्यात संतुलन साधणे ही सर्वच देशांतील तज्ज्ञ व सरकारी यंत्रणांसाठी तारेवरची कसरत असते. पण जेव्हा अन्नधान्याचा महागाईचा दर हा सर्वसामान्यांच्या ऐपतीच्या पुढे जातो तेव्हा मात्र विकासावर बंधन घालूनही महागाईवर अंकुश ठेवणे गरजेचे भासू लागते. आज भारतीय अर्थव्यवस्थेचा एक आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या रिझर्व्ह बँकेने विकासापेक्षा महागाई नियंत्रणाला प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. त्यामुळे व्याजदर वाढवून, पतपुरवठा महाग करून त्यांनी औद्योगिक क्षेत्राला पेचात पकडले आहे. पूर्वीच्या वाढीव व्याजदरांमुळे व अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमतीमुळे दिवाळीतच मालाची मागणी कमी होत असताना कर्जपुरवठा महाग करून औद्योगिक विकासाला अत्यंत घातक धोरण लागू करण्यात येत आहे. दुर्दैवाने जगात आज भारत हा असा एकच देश आहे की, ज्याने महागाईविरुद्ध व्याजदरवाढीचे शस्त्र सतत उगारत विकासाला प्राधान्य न देण्याचे धोरण ठेवले आहे. जगातील इतर सर्व प्रगतीशील देशांत म्हणजेच ब्राझिल, टर्की, दक्षिण आफ्रिका इत्यादी देशांत व्याजदर कमी ठेवून शेती-उद्योग विकासावर भर देण्याचे धोरण अंगिकारण्यात आले आहे. भारतीय धोरणात धोका एवढाच आहे की, पूवीर् १८ महिन्यांत १२ वेळा व्याजदर वाढूनही महागाईचा दर वाढतच राहिला आहे. तरीही एकच धोरण पुढे रेटण्याचा हट्टीपणा रिझर्व्ह बँकेने कायम ठेवला आहे. हे धोरण ठेवणारा भारत हा जगात एकटाच देश असला तरी आणि मागील धोरणात त्याला अपयश आले असले तरीही व्याजदरवाढीच्या धोरणाचा पाठपुरावा अजून सुरूच आहे. आता पुढील काही महिन्यांत जर महागाईचा दर कमी झाला नाही तर मात्र वाढलेली महागाई व खुंटलेला विकास अशा दोन्ही समस्यांना रिझर्व्ह बँक किंवा अर्थमंत्री कसे तोंड देणार, हा प्रश्न बऱ्याच तज्ज्ञांनाही पडलेला आहे.

उत्तर सोपे नाही!

महागाई - विकास ह्यांचे संतुलन राखणे हे आताच्या परिस्थितीत फक्त तज्ज्ञ पुस्तक पंडितांचे काम राहिलेले नाही तर त्यात समाजशास्त्रीय व राजकीय दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. पुढील दोन वर्षांत येऊ घातलेल्या निवडणुका, भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे महागाईकडे लोकांचे झालेले दुर्लक्ष, ढासळत चाललेली जागतिक अर्थव्यवस्था, सतत वाढत असलेले तेलाचे भाव, मध्यपूर्वेत चाललेले राजकीय फेरफार ह्या सर्वांच्या पार्श्वभूमीवर भारतातील महागाईचा वाढता दर व त्याचा शेतकी-औद्योगिक विकास ह्यांच्यात मेळ घालण्यासाठी अनेक तज्ज्ञांनी एकत्रितपणे समन्वयाने निर्णय घेणे भारताच्या हिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. बाजारातील इतर वस्तूंची महागाई नियंत्रित करण्यापेक्षा प्राधान्याने अन्नधान्य, दूध इत्यादी वस्तूंची महागाई कमी करणे हे सर्वसामान्य भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मोटार, फ्रीज, स्वस्त होण्यापेक्षा दररोज लागणारे दूध, कांदे व डाळी स्वस्त होणे आवश्यक आहे. त्याकरिता व्याजदर वाढीचा उपाय सतत फोल ठरत असताना त्याचाच हेका कायम ठेवणे येणाऱ्या वर्षांमध्ये कदाचित देशाला अत्यंत धोकादायक ठरू शकते. सध्याच्या जागतिक परिस्थितीत भारतीय शेतकरी अधिक चांगल्या प्रकारे पीक कसे घेऊ शकेल, जमिनीची उत्पादकता कशी वाढवू शकेल ह्याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. ह्याशिवाय अडते व वायदेबाजारांमुळे भाववाढ होत नाही ना, ह्याकडे लक्ष देणे जरुरीचेआहे. उत्पादन झालेला एकही धान्याचा कण सडून फुकट जाणार नाही तर तो भारतीय जनतेच्या तोंडीच लागेल ह्याकरिता लागणारी साठवण व्यवस्था, सार्वजनिक वितरण व्यवस्था ह्या सक्षम व नेटाने चालवणे गरजेचे आहे. हे केल्यावर अन्नधान्य महागाईचा दर दक्षिणायन करेल. त्यानंतर विकासाचा दर वाढवण्याकडेही लक्ष देणे गरजेचे राहील. आज महागाईची झळ पोचल्याने ग्रामीण व नागरी अशा दोन्ही भागात मालाच्या मागणीवर बंधने येत आहेत. चीनसारखा देश आज स्थानिक लोकांची बाजारातील मागणी वाढावी ह्याकरिता आटोकाट प्रयत्न करीत असताना आपण मात्र मागणी कमी करून विकासाचा दर कमी करण्याच्या प्रयत्नात आहोत.

आज आपल्याला एक अर्थतज्ज्ञ पंतप्रधान म्हणून लाभला असताना अशा कठीण परिस्थितीत मार्ग निघण्याची शक्यता जास्त आहे. पण हे एकाच पंतप्रधानाचे काम नाही. त्याकरिता इतर विचारांचे अर्थतज्ज्ञ, समाजतज्ज्ञ व जाणकार राजकारणी ह्या सर्वांनी पक्षीय मतभेद दूर ठेवून एकत्रितपणे विचार करणे जरुरीचे आहे. उत्तरे सोपी नाहीत पण अशक्यही नाहीत. अशा अग्निदिव्यातून भारतीय अर्थव्यवस्था यशस्वीपणे तावून सुलाखून निघाली तर पुढच्या दोन दशकांमध्ये जागतिक महासत्तांच्या पंगतीत जाण्याचे स्वप्न नक्कीच साकार होईल.

पण ह्या सर्वांबरोबर आपण आम जनतेनेही सरकारवर व सर्व आर्थिक संस्थांवर आपला दबाव बनवणे आवश्यक आहे. तो केवळ एका लाटणे मोर्च्याने किंवा उपोषणाने किंवा एखाद्या निवडणुकीने साध्य होणार नाही. जनता जेव्हा आपल्या हक्कांविषयी व कर्तव्यांविषयी सतत जागृत असते तेव्हा राज्यकर्त्यांनाही आपली कर्तव्ये सचोटीने पार पाडावी लागतात. महागाई व विकास ह्यातील संतुलन साधणे हे जनतेचेही कर्तव्य आहे. आपण अंथरुण पाहून पाय पसरतो की पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करून आपल्या सवयी वाईट करून घेतो, भ्रष्टाचाराला विरोध हे आपले जीवनमूल्य बनते की एखाद्या टी.व्ही. चॅनेलचा इव्हेंट बनून संपते, यावर आपल्या देशाचा सशक्त विकास अवलंबून आहे. अन्यथा सततच्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये रंगून जात व ते संपताच एफ १च्या वेगामध्ये आपण बुडून जात राहिलो तर खऱ्या प्रश्नांशी सामना करायला थोडेच लोक शिल्लक असतील. पुढच्या पिढीला आपल्यापेक्षा बलवान भारत द्यायचा असेल तर ह्या नवनवीन अफूच्या गोळ्या घेणे बंद करायला हवे!



धन्यवाद.

सुषमा कदम. 
 
Benchmark Advisory Services Pvt. Ltd.
G-53, Eternity Mall, Teen Hath Naka,
Thane(W) Mumbai - 400606
Tel. :   + 91 022 2581 4542 (D)
Fax :  + 91 022 2581 4542
Mobile number : 9930424225/9324184541
 
E-mail : benchmarkadvisoryservices@gmail.com

 

 

मी मुंबईकर, मी मराठी अन्‌ "हूं गुजराती!'

प्रकाश अकोलकर
Tuesday, August 09, 2011 AT 03:00 AM (IST)

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने

राज ठाकरे यांनी गुजरात दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे.

राज ठाकरे सध्या गुजरातेत आहेत. सोबत पत्रकार आहेत, त्याचबरोबर विविध क्षेत्रांतील जाणकारही. कुणी व्यवस्थापन शास्त्राचा तज्ज्ञ आहे, तर कुणाचा विदेशी राजनीती आणि अर्थनीती यांचा अभ्यासक आहे. कोणी सामाजिक कार्यात आपली हयात घालवलेली आहे. "हा आपला अभ्यासदौरा आहे, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही,' असं राज यांनी आधीच सांगून टाकलं आहे. पण दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी "टीम राज'चं जातीनं स्वागत करून "टीम राज'ला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल, अशी व्यवस्था केली आहे.

राज यांनी या दौऱ्याची आखणी मोठ्या चतुराईनं केली आहे. राजकीय, भावनात्मक आणि अभ्यास अशी तीन स्तरांवर समाजमनाशी धागा जोडण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई महापालिका निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आलेल्या असताना, मुंबईतील ४० लाखांच्या आसपास असलेल्या गुजराती समाजाचे आयकॉन नरेंद्र मोदी यांच्यावर राज स्तुतिसुमनं उधळत आहेत. समजा, यात काही व्यावहारिक राजकारण नाही, तरी भावनेच्या पातळीवर होणाऱ्या राजकारणाचं काय? राज यांनी टायमिंग तर मोठं अचूक साधलंय!

ंमुंबईतल्या गुजराती समाजाची पहिली तार अशा रीतीनं छेडल्यावर राज महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विसरलेले नाहीत. अहमदाबादेत राज प्रथम साबरमती आश्रमात जातील, असं कुणी सांगितलं असतं, तर त्यावर विश्‍वास ठेवणं कठीण गेलं असतं. पण, राज साबरमती आश्रमापाठोपाठ थेट पोरबंदरला, महात्माजींच्या जन्मगावीही गेले. शिवाय, वल्लभभाईंनाही आदरांजली वाहायला ते विसरले नाहीत. सर्व स्तरांवरील गुजराती समाज "कनेक्‍ट' राहावा म्हणून केलेली ही आखणी होती. भले, यात राजकारण नसेलही कदाचित... पण या दौऱ्यामुळे निदान मुंबईतील गुजराती समाजानं तरी सुटकेचा निःश्‍वास नक्‍कीच सोडला असणार. कारण राज शिवसेनेतून बाहेर पडून सहा वर्षं उलटली असली, तरी त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरवातीच्या काळात उत्तर भारतीयांविरोधात केलेली हिंसक आंदोलनं मुंबईकर अद्याप विसरलेले नाहीत. खरं तर राज यांनी शिवसेनेला अखेरचा "जय महाराष्ट्र!' करण्याआधीच उद्धव यांनी शिवसेनेच्या "मी मराठी' या बाण्याला "मी मुंबईकर' असं समंजस स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. १९६०च्या दशकात शिवसेना स्थापन झाली, तेव्हा त्या संघटनेचा "यूएसपी' म्हणजेच युनिक सेलिंग पॉईंट "मी मराठी' असणं जितकं स्वाभाविक होतं, तितकंच जागतिकीकरण आणि शिवाय पुढे घेतलेला हिंदुत्वाचा वसा या पार्श्‍वभूमीवर एकविसाव्या शतकात तो "मी मुंबईकर' असणं अपरिहार्य होतं. वैचारिक स्थित्यंतराची ही प्रक्रिया जितकी नैसर्गिक होती, तितकीच ती अर्थातच राजकीयही होती. पण, त्यावर शिवसेनेतच वादळं उठली. मराठी माणसाला आपण वाऱ्यावर तर सोडत नाही ना, असे सवाल केले गेले आणि अखेर रेल्वे बोर्डाच्या परीक्षेस येणाऱ्या उत्तर भारतीयांना कल्याण स्थानकावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी जबरी मारहाण केली. "मी मुंबईकर' या संकल्पनेचं विसर्जनही तिथंच कल्याण रेल्वे स्थानकात झालं. खरं तर हिंदुत्व हा श्‍वास असेल, तर मराठी हा प्राण आहे किंवा हिंदुत्व प्राण असेल, तर मराठी श्‍वास आहे, अशी भाषा शिवसेनेच्या व्यासपीठावरून त्याआधी सुरू झालीच होती. त्यामुळे एकीकडे मराठी बाणा कायम ठेवून ज्या पद्धतीनं हिंदुत्वाची झूल पांघरण्यात आली होती, त्याच धर्तीवर पुढे "मी मुंबईकर' ही मोहीम शिवसेनेनं राबवायला हवी होती; पण, आपल्या मराठी व्होट बॅंकेला खिंडार पडेल, या भीतीनं त्याकडे पाठ फिरवण्यात आली. मराठी मतपेढीला खिंडार अखेर पडलंच, पण ते दोन वर्षांनी, राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर. त्यामुळेच आताच्या राज ठाकरे यांच्या या गुजरात दौऱ्यामुळे अनेक प्रश्‍न विचारता येऊ शकतात. राज यांनी आता "हूं गुजराती...' असा आवाज लावण्याचं खरं कारण आपल्याला कळणं कठीण आहे. पण, राज यांचं मोदींवर पूर्वापार प्रेम आहे. गुजरात विधानसभेच्या निवडणुका २००७ मध्ये झाल्या, तेव्हाही त्यांनी आपले खास दूत म्हणून शिशिर शिंदे यांना अहमदाबादेत पाठवलं होतं आणि शिंद्यांनीही मोठ्या प्रेमानं मोदी यांची भेट घेऊन, त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे कदाचित या दौऱ्यामागे राजकारण नसेल आणि तो "फ्रेंडशिप डे'च्या निमित्तानं आयोजित केलेला मैत्री सप्ताहही असू शकतो.

पण, एक गोष्ट मात्र विसरता येणार नाही; राज ठाकरे हे कधीतरी आपल्यापुढे महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट सादर करणार आहेत. त्यांच्यासाठी ही स्टडी टूर असू शकते. त्याला गुजरातचा विकास कारणीभूत असणार. पण नेमक्‍या याच काळात नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारचाही चांगलाच विकास झाला आहे. गुजरातनं मारलेल्या मजलेपेक्षा बिहारच्या प्रगतीचं महत्त्व मोठं आहे, कारण ती शून्यातनं झालेली निर्मिती आहे. राज यांनी आता लगोलग बिहारचाही अभ्यासदौरा केला, तरच गुजरात दौऱ्यामागे राजकारण नाही, असं आपण ठामपणे म्हणू शकू!

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत
पहिले आम्हा दोघांमध्ये
फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत
इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत....

पहिला पाऊस पडतो तेंव्हा

पहिला पाऊस पडतो तेंव्हा . . . . . . .
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं !
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी तळं होऊन साचायचं !
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो हे आपण लक्षात ठेवायचं
! म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन पावसात जाऊन भिजायचं

 

कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच......

"Half the truth is often the whole lie"

तुझ्या रुपात मन कैद माझे झाले.
तो कविता वाचत होता.
"गप रे" ति वैतगली होति.
जरा सिरीयस बन. २ वर्षे झालीत..
बाबा मागे लागलेत लग्नासाठी..
माझा हो कळव.. तो हसत म्हणाला..
अन काय कळवणार? तुला ना नोकरी,
ना काहि व्यवसाय. अरे लग्न म्हणजे गंमत नाहि.
अग गंमतच आहे. लग्न म्हणजे सहजिवन, प्रेम,
एकमेकात आडकण.लग्न म्हणजे संलग्न.
वेडा आहेस. अरे लग्न म्हणजे संसार,
म्हणजे घर, दुध, किराणा, मुल,लग्न म्हणजे पैसा..ति म्हणाली
हातात हात तुझा, अन तुझी साथ. पैसा येइल. येतो. तो म्हणाला
पैसा म्हणजे परसातल प्राजक्ताच झाड नाहि.
हालवल कि फुलांनी आंगण भरुन जात..तिन फटकारल..
अग पण, तो बोलायच्या आतच ति म्हणाली..
पैसा कि प्रेम हा वाद विवाद कालबाह्य आहे..
प्रेमाच्या जागी प्रेम आहे, अन पैसा त्याच्या जागि.
तु मल खुप आवडतोस.. पण तु मला विचार करुन निर्णय दे.
तिन अल्टिमेटम दिला..
१४ फेब्रुवारी चा दिवस होता आज खिशात पैसे होते.
दिवस तिच्या बरोबर मजेत घालवायचा होता.
त्यान तिला फोन केला.बर झाल, फोन केलास,
मला पण तुझ्याशी बोलायच आहे.ति म्हणाली.
नो प्रोब्लेम.. ताज मधे भेटु. काय?.. ति उडालीच.
ताज च्या थंडगार वातावरणात, ति सुखावलि होति.
मग काय ठरल?.तिन विषयाला हात घातला.
तो बोलतच नव्हता. मी थांबु शकत नाहि.
हि आपली शेवटची भेट.. तिच्या बोलण्याला धार होति..
तो आतुन तुटत चालला होता..प्लिज..
अरे प्लिज काय? सारच कठीण आहे.ति म्हणाली.
मी निघते? ..प्लीज थांब, मला एक संधी दे..तो म्हणाला.
तु फक्त एक वर्ष दे मला, तुल पाहिजे तेवढा पैसा देतो...तो म्हणाला.
ति खळखळुन हसली." वेडा रे"अरे पैसा म्हणजे?...
आय नो. त्यान वाक्य तोडल."किति पैसे लागतात संसाराला?
लाखो रुपये ति म्हणाली..ठीक आहे. एक डिल.तो म्हणाला.
आपण पुढच्या १४ फेब्रुवारीला आपण इथच, ताज मधे,संध्याकाळी. ७ ला भेटु.
अन काय करु..तिन विचारल..
मी त्या दिवशी तुझ्या पायावर ७५ लाख रुपये ओतिल...तुला संसारा साठी.
त्या चित्रपटांत हिरो हिरॉइन ला नोटांनी अंघोळ घालतो तशी.अंघोळ घालीन...
तो हसत म्हणाला."मॅड आहेस." पण म्हणुनच तु मला आवडतो.ति..
पण वचन दे, वाट पहाशील म्हणुन.. तो म्हणाला.
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली. .....
कंटिन्यू.....
ठिक आहे, पण ७५ रुपये तरी आणशील अस वाटत नाहि. ति हासली.
१४ फेब्रुवारी तो तिचि ६ वाज ल्या पासुनच वाट पहात होता.
तेच टेबल होत, मागच्या वर्षीच, ति ये‌इल? तो अस्वस्थ होता
७ वाजायला आले होते, अन तेवढ्यात ति आत येताना दिसली.
तिच्याशी नजरानजर होतच त्यान हात हलवला.
हाश हूश करत ति समोरच्या खुर्चीवर बसली.
कशी आहेस? फार गरम होत आहे. पहिल पाणी पिते.
म्हणत उठुन ति त्याच्या समोरच्या ग्लास घ्यायल वाकली.
ति वाकली असताना, त्याला ब्ला‌उज मधे लपवलेल्या मंगळसुत्रचा पदर दिसला.
अग मी मागवतो म्हणेपर्यंत तिन ग्लास तोंन्डाला लावला होता.
अरे फार पाणी पाणी झाल होत.. हं आता बोल.
काय बोलु? तुच सांग. तिच्याकड बघत तो म्हणाला.
मग काय? कुठे आहे ७५ लाख? ति हसत म्हणाली..
त्याचा चेहेरा पड्ला होता., नाहि जमल, तु म्हणालीच तेच खर.
७५ लाख काय ७५ रु जमले नाहि. पैसा मिळवण कठिण आहे..
जा‌उ देत, मला माहित होत, ति समजावणीच्या स्वरांत म्हणाली.
मला पण तसच वाटत होते. पण म्ह्टल तुला शब्द दिला होता...
तो बघत होता..अजुन काय? पडलेल्या चेहे~यानि तो म्हणाला.
सांगु ति म्हणालि.. अरे माझ लग्न झाल, घरचे मागे लगलेच होते.
तो बॅन्केत आहे, १ बेडरुमच घर आहे... तुझ अस.. ति म्हणाली. सॉरी..
तुझ खर आहे., तु ठीकच केल, माझ्याबरोबर.... वायाच गेल असत.
तो म्हणाला.. ठीक आहे. मी निघते, तुला आता अस भेटण बर नाहि
निघते.. ति म्हणाली.. तो तिच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता..
तो बराच वेळ बसुन होता. सार संपल होत.
रुम च्या नोकरानि टॅक्सीत सामान भरल..
सर कुठे? टॅक्सी ड्रायव्हर ने विचारले.
सहारा एयर पोर्ट. ईंटर नॅशनल टर्मीनल.
टॅक्सी वेगात चालली होति,
गार हवेच्या सपक्यान डोक शांत होत होत.
विमान तळावर टॅक्सी थांबली,
त्यान ट्रॉलीत लगेज भरल.व भाड देवुन तो निघाला,
सर,टॅक्सी ड्रायव्हर ने हाक मारली,
सर, तुमची बॅग राहिली आहे,
त्यान टॅक्सी ड्रायव्हर कड बघितल, अन म्हणाला
बॅग तुला राहु देत, त्यात ७५ लाख रुपये आहेत.
नाहितरी, मला आता त्याचा काहिच उपयोग नाहि,
ड्रायव्हर बराच वेळ त्याच्या पाठमो~या आकृति कडे बघत होता
कडु गोड आठवणीत तुझ्या साठव मला
मैत्रीचा हात हवा असल्यास आठव मला
माझ्या वाटेचा आनंद तुझ्याकडे ठेव
तुझ्याकडे काही दु:ख असतील तर पाठव मला.....
आधी विचार करा, मग कृती करा!!!

 

एका रात्री मी घरी आलो....

हे लग्न झालेल्यांनी, न झालेल्यांनी

 आणि लग्न होणार असलेल्यांनी......

 नक्कीच वाचा: विचार करा.

 एका रात्री मी घरी आलो ते मनाशी काही ठरवूनच. जेवताना मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "मला तुझ्याशी काही बोलायचं आहे." तिच्या डोळ्यांत वेदना उमटली; तरीही ती शांतपणे जेवत होती, सगळे शब्द जुळवून मी तीला सांगितलं, मला घटस्पोट हवाय." तिने शांतपणे विचारल,- "का?"
 तिचा प्रश्न मी टाळला, ती भडकली. समोरच ताट तिने भिरकावून दिलं. लग्न मोडायला नेमकं काय आहे, हे तिल जानुन घ्यायच होत; पान माज़् मन दुसर्य स्त्रीवर आलय हे मि तिला स्पष्टपणे सांगू शकत नव्ह्तो. माझा बँक बलन्स, कार, घर, सगळ मी तिला देऊ केलं: पण मी समोर केलेल्या घटस्पोटाच्या कागदाचे तिने तुकडे केले. दुसऱ्या दिवसी तिने माझ्यासमोर घटस्पोटा विषयीच्या अटीचा कागद समोर केला. तिला माझ्याकडून काहीही नको होते, फक्त एक महिन्याची नोटीस हवी होती आणि या एक महिन्यात दोघांनीही नॉर्मल रहावं अशी तिची इच्छा होती. तिची कारणे साधी होती. महिन्याभरात आमच्या मुलाची परिक्षा होती आणि त्याच्यावर काहीही परिणाम व्हायला नको होता. तिची आणखी एक अट होती लग्नाच्या दिवसी मी तिला बेडरूम पर्यंत कसं उचलून नेलं होत. त्याप्रमाणे रोज महिनाभर तिला न्यायचं होत तशी तिची अटच होती. मला वाटलं तिला वेडलागलंय; पण महिना व्यवस्थित जावा यासाठी मी तिची अट मान्य केली. घटस्पोटाच्या विचारामुळे अनेक दिवस माझा पत्नीसोबतचा संपर्कच झालेला नव्हता. त्यामुळे पहिल्या दिवसी बेडरूम पर्यंत तिला नेताना आम्ही दोघही फार अवघडून गेलो. मी तिचा हात धरून बेडरूम पर्यंत नेतान माझ्या मुलाने बघितलं आणि त्याला फार आनंद झाला. दुसया दिवसी ती माझ्या छातीला टेकून होती. आपण आपल्या बायकोकडे बरेच दिवस. नीट बघितलेच नाही हे मला जाणवलं; आणि तिचा सहवास मला अचानक हवाहवासा वाटू  लागला. आपण हिच्या बाबतीत असा अचानक निर्णय का घेतोय असा प्रश्न पडला. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसी तिला उचलून किंवा सोबत बेडरूम पर्यंत नेताना. आमच्यातली एक हवीहवीशी जवळीक वाढत असल्याचं मला जाणवलं. रोजच्या प्रमाणे  तिला अचानक उचलताना मला जाणवलं तीच वजन कमी झालंय. हृदयातल्या वेदनाचां हा परिणाम होता. मी आस्थेने तिच्या कपाळाला स्पर्श केला. दिवसागणिक तीच कमी होणारं वजन माझी काळजी वाढवत होत. पण तिच्या अटीच पालन करताना मला आंतरिक समाधान मिळत होत, आमच्यात काय घडतंय याची कल्पना नसतानाही आमचा मुलगा खूप खुश होता.
 आमच्यात दुरावा निर्माण झाला होता कारण आमच्यातली जवलीकच संपली होती. जी परत आयुष्यात येत होती. महिन्याच्या शेवटच्या दिवसी - मी मनाशी निर्णय घेतला. माझ्या प्रेयसीच्या घरी आलो आणि मी माझ्या पत्नीला घटस्पोट देऊ शकत नसल्याच स्पष्टपणे सांगितले. ती चिडली, संतापली, पण आता मला काही ऐकायाच नव्हते. माझ्या प्रिय पत्नीचा हात मला आता मरे पर्यंत सोडायचा नव्हता. मी वेगाने CAR चालवत घरी आलो. माझ्या चेहऱ्यावर हसू होत. हातात फुलांचा गुच्छ होता. मी बेडरूम मध्ये पोहचलो, तर माझी प्रिय पत्नी बेडवर निष्प्राण पडलेले होती. मुलाला जवळ घेऊन मी अनावर रडत सुटलो. माझ्या प्रेमापायी तिने जीव दिला होता. ती असताना मी जे करायला हव ते केल नाही. 
 जे प्रेम , जी जवळीक तिला हवी होती ती मी तिला दिली नाही. आता माझे अश्रू.
 तिला परत आणू शकत नव्हते.
 पती-पत्नीच्या नात्यात कार , बंगला , प्रेयसी, पैसा काहीही महत्वाच नाही.
 महत्वाच आहे ते प्रेम, जवळीक आणि विश्वास.
 वाचा आणि विचार करा. स्वताला विचार--- " आपल वैवाहिक आयुष्य खरच सुखाचं आहे?"
 
या कहाणीचा एकच संदेश आहे.
 
" जे आहे, जे प्रेमाच आहे, जे प्रेमाचे आहेत" ते प्राणपणाने सांभाळा.
नाही तर पश्चाताप.....

प्रतिक्रिया:

about ur web

Date: 12/05/2011 | By: rajesh dixit

Nice to see the work u have done.

Re: about ur web

Date: 13/05/2011 | By: mahavir

thanks rajesh

New comment