महाराष्ट्र माझा
खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने
महाराष्ट्राबाहेरील मराठी माणूस महाराष्ट्राकडे कसा पाहतो? महाराष्ट्राकडून त्याच्या काय अपेक्षा असतात? त्या पूर्ण होतात का? महाराष्ट्र दिनानिमित्त एका ‘इंदूरवासीया’ने व्यक्त केलेली मते-
जन्मापासून पन्नाशीपर्यंतचा काळ इंदुरात घालवल्यावर आणि कामानिमित्त महाराष्ट्रात बऱ्यादा येऊन गेल्यानंतरही अगदी कालपरवाची गोष्ट सांगतो. वयाची तिशी उलटल्यानंतर काही कामाने बऱ्हाणपूरला गेलो होतो. मित्राची नवी कार होती म्हणून कौतुकाने फिरायला गेलो असता वीस-बावीस किलोमीटरनंतर एका झाडाखाली गाडी थांबवत मित्राने ‘इथून महाराष्ट्र सीमा सुरू होते’ असे सांगितलं, ऐकताक्षणी झपाटल्यासारखा मी खाली उतरलो व तेथील माती उचलून कपाळावर लावली, मित्र आणि त्याची बायको, ‘काय हा वेडेपणा’ या नजरेनं माझ्याकडे बघतच राहिली, आणि अत्यानंदाने दाटलेला घशातला कढ सावरीत मी पुन्हा गाडीत बसलो.
त्यानंतर हे असं अनेकदा झालं, वयानुसार ‘वाटणं’ कमी झालं, भावनांची धार बोथट झाली, मात्र आपल्या माहेरभूमीबद्दलचं प्रेम दिवसेंदिवस वाढतच जातंय आणि हा माझा एकटय़ाचा अनुभव नाही, तेरेखोल ते तोरणमाळ आणि डहाणू ते गोंदिया असा महाराष्ट्राचा उभा-आडवा विस्तीर्ण नकाशा नुसता समोर जरी ठेवला, तरी आम्हा महाराष्ट्राबाहेरील मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. आम्हा लोकांची पाळंमुळं याच मातीत कुठेतरी खोलवर रुतल्याची तीव्र जाणीव आम्हाला या भूमीकडे सातत्याने ओढीत असते. महाराष्ट्राबाहेर पडल्यानंतर आमची जात, धर्म, कुळ, मूळ गाव या सगळ्या जाणिवा नाहीशा झाल्या. हा कोकणातला, तो वऱ्हाडातला, मी खानदेशाचा वगैरे दुजाभाव संपून आम्ही फक्त आणि फक्त मराठी माणूस म्हणून गर्वाने देशभर मिरवतो.
या देशाकरिता कितीतरी लेखक, कवीमंडळींनी अद्भूत आणि अथांग लिहून ठेवलंय. कणखर देश, दगडाचा देश, मावळ्यांचा देश, संतांची भूमी, कलाकारांची- खेळाडूंची भूमी, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञांची भूमी, कृष्णा- गोदावरी- कोयना- भीमेच्या अमृतजलानं पवित्र झालेला महाराष्ट्र अन् काय न् काय, या देशाचं कौतुक करायला सारस्वत वाणीही थिटी पडावी असा या महाराष्ट्राचा बाज, याच्याच मोहात पडून, १९२६ सालच्या इंदूरात संपन्न झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमलेनात धारचे सी. का. देव यांनी ‘कोटी कोटी प्रणिती तुझ्या चरण तळवटी, जय जय जय जय विजये माय मराठी’ हे संमेलन गीत लिहिलं व हिराबाई बडोदेकर यांनी ते औंधच्या महाराजांसमोर गावून अमर केलं. हे गीत आजही माळव्यातील मराठी कार्यक्रमात आवडीने गायलं जातं.
खरं तर महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आम्हाला फार हेवा वाटतो. आपल्या आईच्या कुशीत विसावलेल्या पिलाकडे पाहून कुणा आईपासून दूर असलेल्याला वाटेल असा हेवा, आमचा महाराष्ट्र, आमची मराठी भाषा, आमचे बांधव. या मातीच्या प्रचंड ओढीनं माझा चुलतभाऊ इंदूरातली अर्थसरकारी नोकरी सोडून पश्चिम महाराष्ट्रातल्या एका मोठय़ा शहरातल्या खासगी कंपनीत नोकरीला गेला. आता भरपूर मराठी वाचायला मिळेल, सहकाऱ्यांशी साहित्यिक चर्चा घडतील, अमृतानेही पैजा जिंकणाऱ्या मराठी भाषेचा सातत्याने सहवास लाभेल याचा त्याला प्रचंड आनंद होता, पण चिरंजीव तीन महिन्यांतच इंदूरला परतले. ‘नव्वद दिवसांत शंभर लोकांनी जात विचारली रे माझी’ परतल्यावर अत्यंत दुखावलेल्या सुरात तो सांगत होता. ‘मी मराठीत प्रश्न विचारला, तर समोरचा मराठी माणूसच हिंदीत उत्तर देतो. मराठी वाहिनी दाखवायला केबलवाला तयार नाही, मराठी वाहिनीचा आग्रह केल्यास, ‘पाच-सात लोकांकरिता कशाला वेगळे पैसे खर्च करू?’ म्हणत त्याने माझं कनेक्शनच बंद करण्याची तयारी दाखवली. बाजारात मराठी बोलायला गेलं, तर दुकानदार बावळट समजतो. भाजीवाली ‘जावा फुडं’ म्हणते. कुठला आलाय आपला महाराष्ट्र अन् कसलं काय, आता पुण्याचं नाव ‘पाटलीपुत्र’ आणि मुंबईचं नाव ‘बनारस बुद्रुक’ केलं की आपण अल्पसंख्याक म्हणवून मोकळे. ‘तो पोटतिडकीनं बोलत होता. कुणाही मराठीभक्ताच्या मनात कालवाकालव होईल असाच त्याचा सूर होता.
महाराष्ट्रातील प्रत्येक गतविधी आमच्या मानसिक दिनचर्येला नियंत्रित करते. तेथील आंदोलने, सामाजिक घडामोडी, सांस्कृतिक चळवळ, या ना त्या कारणाने विवादास्पद झालेले प्रकल्प, त्या प्रकल्पांचं बरंवाईटपण न तपासता त्यावर होऊ घातलेलं निलाजरं राजकारण, एकूणच अस्थिर राजकारण किंवा इतर अनेक घडामोडी, इतर प्रांतियांसमोर आमची मान खाली घालण्यास किंवा घर उंचावण्यास कारणीभूत ठरतात, भ्रष्टाचाराचा विषय निघाला की पूर्वी बिहारचं नाव यायचं, आता निर्विवाद महाराष्ट्राच येतं. राष्ट्रीय स्तरावरसुद्धा मराठी पुढारी मंडळी भ्रष्टाचार करण्यास चढाओढीनं भाग घेत त्या क्षेत्रात नवनवे मापदंड स्थापित करू लागली आहेच, पण त्यामुळे आम्हाला मात्र इतर भाषिक लोकांसमोर लाजिरवाणं होऊ लागलंय. अर्थात, महाराष्ट्र भारताचाच एक भाग आहे आणि देशांत एकूणच यादवी माजल्याने या प्रवृत्तीला महाराष्ट्र अपवाद असल्याची काडीमात्र शक्यता नाही. पण अनुकरणच करायचं झालं तर ते पूर्वीच्या बिहारचं नको. तेथील लोकांनी इथे येऊन आपलं अनुसरण करायचं की आपणच त्यांचं अनुसरण करीत
आपला सोन्यासारखा प्रांत हट्टाने रसातळाला न्यायचा याचा विचार मराठी समाजकारण्यांनी करायची गरज आहे. राजकारण्यांकडून मात्र आता कुठलीच अपेक्षा नाही.
बृहन्महाराष्ट्रातील आम्ही मराठी लोक महाराष्ट्राकडे फार आशेनं बघतो. एक मे चा महाराष्ट्रदिन गटागटांत का होईना, उत्साहाने साजरा करतो. त्याचबरोबर मुंबई आता महाराष्ट्राचा भाग वाटत नाही याची खंत आणि आता पुणेही त्याच दिशेनं चाललंय याची भीतीही वाटते. याउलट बृहन्महाराष्ट्रातच ठिकठिकाणी लहान-लहान कितीतरी महाराष्ट्र बघायला मिळतात. मराठीपणाचा अभिमान असलेला निर्भेळ व सात्विक महाराष्ट्र, शिवाजी, शाहू महाराज, बाजीराव, यशवंतरावांनी घडवलेला महाराष्ट्र, बस्, आमच्या रक्तात भिनलेला व स्वप्नांत वसलेला हा असाच महाराष्ट्र उत्तरोत्तर प्रगती करीत आभाळाची उंची गाठेल याची खात्री आहे. आम्ही बृहन्महाराष्ट्रातील मराठी लोक महाराष्ट्राच्या हाकेला साद देण्यास तयार आहोत..
..अगदी अर्ध्या रात्रीसुद्धा.